जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा चढत असून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा (Heatstroke) धोका निर्माण झाला असून, नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन अमरावतीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांनी केले आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विशेष मार्गदर्शक सत्रात डॉ. पारिसे यांनी नागरिकांना उष्माघातापासून बचाव करण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली.
उष्माघातापासून वाचण्यासाठी डॉ. पारिसे यांनी सुचवलेले उपाय
पाण्याचे भरपूर सेवन :- तहान लागलेली नसली तरीही दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी ओआरएस , लिंबू सरबत, नारळ पाणी किंवा ताकाचा वापर करावा.
दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळा :- शक्यतो सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. अत्यंत आवश्यक काम असल्यास बाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.
कपड्यांची निवड: – उन्हाळ्यात हलक्या रंगाचे, सुती आणि सैलसर कपडे परिधान करावेत. गडद रंगाचे आणि घट्ट कपडे टाळावेत.
आहारावर नियंत्रण : – शिळे अन्न खाणे टाळावे. प्रवासात आपल्यासोबत नेहमी पाणी ठेवावे. मद्य, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेयांचे अतिसेवन टाळावे, कारण यामुळे शरीरातील पाणी कमी होऊ शकते.
मुले आणि ज्येष्ठांची विशेष काळजी : – वाढत्या तापमानाचा लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि गरोदर स्त्रियांना लवकर त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्यांना उन्हाच्या संपर्कात येऊ देऊ नका.
उष्माघाताची लक्षणे आढळल्यास काय करावे?
डॉ. पारिसे यांनी उष्माघाताच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचा इशारा दिला आहे. चक्कर येणे, डोके दुखणे, तीव्र थकवा, उलट्या होणे किंवा त्वचेवर लाल पुरळ उठणे ही उष्माघाताची प्राथमिक लक्षणे असू शकतात. अशी लक्षणे दिसल्यास व्यक्तीला त्वरित सावलीत किंवा थंड ठिकाणी हलवावे. त्यांच्या अंगावरील जास्तीचे कपडे सैल करावेत. थंड पाण्याने अंग पुसून घ्यावे. प्रकृती अधिक खालावल्यास विलंब न करता नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात वैद्यकीय सल्ला घ्यावा.
जिल्हा आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना यासंदर्भात सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घेऊन या उष्णतेच्या लाटेचा सामना करण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Add Comment