आरोग्य विषयक

उन्हामुळे १२ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू, प्रशासन अलर्ट मोडवर

बुलढाणा : जनसूर्या मीडिया

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून नागरिकांना गरम झळा सोसाव्या लागत आहेत. त्यात विदर्भात तापमानाने सर्वाधिक उच्चांकी गाठली असून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज ज्ञानपीठमध्ये इयत्ता ६ वीत शिकणाऱ्या संस्कार सोनटक्के या १२ वर्षीय विद्यार्थ्याला कडक उन्हामुळे त्रास झाला. त्यानंतर, पालकांनी त्याला अकोला येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान संस्कारचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनं जिल्हा प्रशासनही खडबडून जागं झालं आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमान वाढले असून विदर्भ आणि मराठवाड्यात चटके देणारं ऊन पडलंय. सोलापूर जिल्ह्याने ४२ अंश सेल्सियसचा आकडा गाठला असता विदर्भातही तापमानाने चाळीसी केव्हाच पार केली आहे. वाढत्या तापमानामुळे दिवसेंदिवस बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना फटका बसत असून कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच, येथील शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात संस्कार सोनटक्के या विद्यार्थ्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती अकोला जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक यांना कळविण्यात आली आहे. त्यामुळे, आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाकडून नागरिकाना काही महत्त्वाच्या सूचना खबरदारीचा उपाय म्हणून केल्या जात आहेत.

नंदूरबारमध्ये पारा ४३ अंश सेल्सियसवर

विदर्भात कडक उन्हाचा कहर पाहायला मिळत असून नंदुरबार जिल्ह्यात उष्माघाताची लाट पसरली आहे. येथे तापमानाचा पारा तब्बल ४३ अंश सेल्सिअस वर पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी ४०°c वर असलेला तापमान आज ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याचे दिसून आले. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यातच उन्हाच्या तीव्र झळा नागरिकांना सोसाव्या लागत असल्याने ते घराबाहेर पडताना देखील विचार करत आहेत. सातत्याने वाढत असलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी घरातच बसणे किंवा सकाळी लवकर, सायंकाळी ऊन उतरल्यानंतर घराबाहेर पडणे पसंत करत आहेत.

जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना

दरम्यान, वाढत्या उन्हामुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपाययोजना सुरू असून शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात येत आहेत. तसेच, नागरिकांनाही महत्वाचं आवाहन केलं जात आहे. जिल्हा रुग्णालयात उष्माघाती कक्षाची निर्मिती केली जात आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!