तालुक्यातील निर्मल उज्वल बँकेचा कारभार मागील अनेक महिन्यापासून सातत्याने चर्चेत आहे. नागरिकांच्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने बँक कारभाराच्या विरोधात ठेवीदारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दि. १६ जून रोजी सकाळी ११ पासूनच बँकेत दुसऱ्यांदा ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आपल्या हक्काची ठेवी ( एफडी ) पूर्ण झाली असताना सुद्धा त्याची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने संतप्त ग्राहकांनी बँक प्रशासनाविरोधात आज दुसऱ्यांदा आक्रमक भूमिका घेतली.
“जोपर्यंत आम्हाला आमच्या ठेवींबाबत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आम्ही बँकेतून उठणार नाही,” असा इशारा आंदोलक ठेवीदारांनी दिला. अनेक दिवसांपासून पैसे काढण्यासाठी फेऱ्या मारूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने ग्राहकांचा संयम अखेर तुटला आहे.
ठेवीदारांचे म्हणन्यानुसार त्यांनी आयुष्यभराची बचत या बँकेत ठेवली असून गरजेच्या वेळी स्वतःचे पैसे मिळत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बँक प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन ठेवीदारांच्या समस्यांचे निराकरण करावे अन्यथा आंदोलन यापेक्षा तीव्र करण्यात येईल असा सज्जड इशारा उपस्थितांकडून देण्यात आला. तसेच जोपर्यंत सक्षम अधिकारी येऊन आपली स्पष्ट भूमिका मांडत नाही तोपर्यंत येथूल हलणार नसल्याचे आंदोलनकर्त्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे काही काळ बँकेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान बँक मॅनेजर सतीश ठाकरे यांच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्याशी फोनवर चर्चा करुन काही फंड तात्काळ पाठविल्याने तो ठेवीदारांना देण्यात आला. तसेच ठेवीदारांशी बोलण्यासाठी उदयाला बँक मध्ये येणार असल्याचे वरिष्ठ अधिकारी राऊत यांच्याकडून सांगण्यात आल्याने ठिय्या मागे घेण्यात आला.
Add Comment