अमरावती राजकीय

मरण आले तरी चालेल पण, आता माघार नाही – बच्चू कडू

अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांचा निर्धार

शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू बेमुदत अन्नत्याग करणार आहेत. मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीजवळ आजपासून (ता. ८) या आंदोलनाची सुरुवात होईल. अमरावतीमधील संत गाडगेबाबा मंदिरापासून ते तुकडोजी महाराज यांच्या मोझरी येथील समाधीपर्यंत बाईक रॅली काढणार आहे. या रॅलीत २० हजार शेतकरी सहभागी होणार आहे. आंदोलनापूर्वी बोलताना बच्चू कडू म्हणाले, ‘आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल. पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता आम्ही मागे हटणार नाही.’
बच्चू कडू म्हणाले, शेतकऱ्यांची कर्जमाफी, दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर मच्छीमारांसाठी आंदोलन करत आहे. यासंदर्भात शासनाकडून आश्वासन मिळाली होती. परंतु त्याची पुर्तता झाली नाही. आता जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन थांबणार नाही. शेतमालांचे भाव पडलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव दिला पाहिजे. घरकुलाचा मुद्दा आहे. मच्छीमारांचा, मेंढपाळ यांचा मुद्दा आहे. अनेक वेळा पत्र देऊनही मागण्या मान्य झाल्या नाही. त्यामुळे अन्नत्याग आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आली आहे.

आता मागे हटणार नाही

दिव्यांगाना मिळणारे मानधन वेळेवर मिळत नाही, त्यावर बोलताना बच्चू कडू यांनी सांगितले की, अधिकारी आणि मंत्र्यांचे पगार वेळेवर होत आहे. परंतु दिव्यांगांचा निधी वेळेवर मिळत नाही. निराधारांचे पगार वेळेवर होत नाही. सरकार जाणीवपूर्वक मुद्द्यांच्या लढाईपासून लोकांना दूर करत आहे. त्यामुळे आता जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही, तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही. माझी अंत्ययात्रा निघाली, तरी आम्ही आमच्या मुद्द्यांपासून दूर होणार नाही, असा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

राज-उद्धव यांनी मुद्यांवर एकत्र यावे

राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, ठाकरेंचा हा कौटुंबिक विषय आहे. मुद्दे घेऊन ते एकत्र झाले तर फार चांगले होईल. राज ठाकरे, उद्धव ठाकरे एका घरातील आहे, म्हणून एकत्र येऊ नये, तर मुद्द्यांवर एकत्र आले पाहिजे. मुंबई वाचवणे फार महत्त्वाच आहे.
महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत राहुल गांधी यांनी लिहिलेल्या लेखाबद्दल बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ईव्हीएम मशीन हे खरे पाहिले तर काँग्रेसचे पाप होते. त्यांनी बी पेरले. काँग्रेसच्या त्या बियाला विषारी फळ भाजपने लावले आहे. त्याचे हे परिणाम आहे. ईव्हीएम मशीनने लोकशाहीला घाला घातला आहे. खून करण्याचे काम भाजपने केले आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!