अपघात

दारूच्या नशेत कारचालकाने चहा पित असलेल्या MPSC च्या १२ उमेदवारांना उडवलं ; घटना कॅमेरात कैद

३ गंभीर जखमी तर ९ जण किरकोळ

जनसूर्या मीडिया 

पुण्यात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुण्यातील सदाशिव पेठ परिसरातील भावे हायस्कूल जवळ एका भरधाव कारने १२ जणांना उडवल्याची घटना घडली आहे. या परिसरातील चहा टपरीवर एमपीएससीच्या १२ उमेदवार निवांत गप्पा मारत चहा पित असताना ही धक्कादायक घटना घडली.
या घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. कार चालक दारुच्या नशेत असल्याच पोलिसांच्या तपासात पुढे आले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ज्या ठिकाणी ही चहा टपरी होती तो रस्ता अतिशय अरुंद आणि छोटी गल्ली असल्याने भरधाव वेगाने आलेल्या कारचा दारूच्या नशेत कार चालकाचा नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. तर नऊ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर संचेती आणि मोडक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये काही विद्यार्थी हे रविवारी होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेला सामोरे जाणार होते.
पोलिसांनी चालकासह तिघांना ताब्यात घेतलं आहे. जयराम शिवाजी मुळे असे आरोपी चालकाचे तर दिगंबर यादव शिंदे आणि राहुल गोसावी अशी अन्य आरोपींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत.तर अविनाश दादासो फाळके, प्रथमेश पांडुरंग पतंगे, संदीप सुनील खोपडे, सोनाली सुधाकर घोळवे, मंगेश आत्माराम सुरवसे, अमित अशोक गांधी, समीर श्रीपाद भालचिकर, सोमनाथ केशव मेरूकट, प्रशांत ब्रह्मदेव बंडगर, किशोर हरिभाऊ भापकर, पायल आदेश कुमार दुर्गे, गुलणाज सिराज अहमद अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. यापैकी तिघांना उपचारासाठी संचेती रुग्णालयात तर इतर नऊ जणांना टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात चार विद्यार्थ्यांचे पाय मोडले. सर्व विद्यार्थी भावे हायस्कूलजवळील चहा टपरीवर चहा पिण्यासाठी आले होते, त्यावेळी हा अपघात घडला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. सदाशिव पेठ हे पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. या परिसरात स्पर्धा परिक्षांचे क्लासेस असल्याचे राज्यातील अनेक भागांतून विद्यार्थी या ठिकाणी एमपीएससीची तयारी करण्यासाठी येतात.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी विद्यार्थ्यांशी संवाद साधला

युवा सेनेचे नेता शर्मिला येवले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बातचीत विद्यार्थ्यांशी करून दिली. जी मदत लागेल ती आम्ही करू असा आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. तर आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून यातून काही मार्ग काढून या विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर घेता येईल का? याबाबत विचार करू असं सांगितला. हे सर्व विद्यार्थी एमपीएससीची तयारी करणारे असून त्यांची उद्या परीक्षा होणार आहे. या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे झाले असून सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द त्यांनी दिला आहे. तसेच जखमींचा सर्व खर्च सरकारच्या माध्यमातून करण्याची घोषणा देखील केली आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!