धामणगाव रेल्वे

से. फ. ला. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी सुरक्षा समिती सभेचे आयोजन..

धामणगाव रेल्वे प्रतिनिधी

आज दि. ५ जुलै २०२६ शासनाच्या निर्देशानुसार व विद्यार्थी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या उद्देशाने सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, धामणगाव रेल्वे येथे विद्यार्थी सुरक्षा समिती सभेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित, सुसंवादी व भयमुक्त शैक्षणिक वातावरणाच्या निर्मितीसाठी ही सभा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.
सभेच्या प्रारंभी शासनाने विद्यार्थी सुरक्षेबाबत निर्गमित केलेल्या शासन निर्णय (जीआर) व परिपत्रकाचे वाचन करून त्यातील महत्त्वाच्या तरतुदींची उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात शाळांनी घ्यावयाची काळजी, शिक्षकांची जबाबदारी तसेच विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या संदर्भात घडणारे विविध प्रकारचे गुन्हे, त्यामागील कारणे आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः सायबर गुन्हे, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, बनावट लिंक, ओटीपी फसवणूक, सायबर छळ (Cyber Bullying) यांसारख्या वाढत्या धोक्यांबाबत शिक्षकांना जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच पोक्सो (POCSO) अधिनियम अंतर्गत बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदी, विद्यार्थ्यांशी संवेदनशील व जबाबदार वर्तन, कोणतीही संशयास्पद घटना निदर्शनास आल्यास तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याची प्रक्रिया आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांबाबत घ्यावयाची आवश्यक काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यालयामार्फत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध सुविधा व उपाययोजनांची माहितीही यावेळी देण्यात आली. सुरक्षित व शिस्तबद्ध शालेय वातावरण, विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण, नियमित समुपदेशन, पालकांशी सातत्यपूर्ण संपर्क, विद्यार्थी सुरक्षा समितीची कार्यपद्धती तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण संरक्षणासाठी करण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे यांनी विद्यार्थी सुरक्षा ही प्रत्येक शिक्षक व कर्मचाऱ्याची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगून विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सतर्कता, संवेदनशीलता आणि जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सभेचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक नरेश कावलकर यांनी केले. त्यांनी सभेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करत विद्यार्थी सुरक्षेबाबत सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. या सभेला विद्यालयातील मिडल स्कूल, हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या माध्यमातून विद्यार्थी सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण होऊन सुरक्षित, सुसंवादी आणि विद्यार्थीहिताचे शैक्षणिक वातावरण अधिक बळकट करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!