धामणगाव रेल्वे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात “ग्रामपंचायती मॅनेज” करण्याचा प्रताप विस्तार अधिकाऱ्याचाच ?​

विस्तार अधिकाऱ्याच्या दबावामुळे ग्रामविकास अधिकाऱ्याचा जीव टांगणीला ?

धामणगाव रेल्वे 

महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत धामणगाव तालुक्यात मधील ग्रामपंचायतींच्या मूल्यमापन प्रक्रियेत आणि गुणांकनामध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार व गैरव्यवहार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क ठरवून दिलेल्या ग्रामपंचायती पेक्षा इतर ग्रामपंचायतीला जास्त गुण देण्यात येऊ नये याची विशेष काळजी, आदेश वजा इशारा पंचायत समिती विस्तार अधिकारी यांच्याकडून देण्यात आला असल्याचा सबळ पुरावा ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या व्हाट्सअँप चॅट व्हायरल झाल्याने समोर आला आहे.
व्हायरल झालेला “तो” मेसेज विस्तार अधिकारी वाघ यांनीच स्वतः टाईप केल्याचा ग्रामविकास अधिकारी यांचा कबुलनामा !
अधिकाऱ्याच्या एका व्हाट्सअँप ग्रुप मध्ये धोटे यांनी स्पस्ट निर्देश दिले आहेत कि, समाविष्ट असलेल्या १२ ग्रामपंचायतींपैकी हिंगणगाव, कावली, ढाकुलगाव, कामनापूर, घुसली आणि पिंपळखुटा या ग्रामपंचायतींच्या गुणांची यादी आधीच ठरवून ‘व्यवस्थित’ ठेवावी. उर्वरित इतर ग्रामपंचायतीचे गुण भरताना विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले असून, त्यांचे गुण वरील पाच-सहा गावांपेक्षा जास्त येणार नाहीत याची खबरदारी घेण्यास सांगितले आहे. इतर गावांना केवळ २० ते ३० गुण देण्यात यावेत, जेणेकरून मुख्य तपासणी समिती त्या गावांमध्ये प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी येणार नाही. जर गुण जास्त दिले आणि समिती तपासणीसाठी आली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांची राहील, अशी धमकीवजा इशारा या मेसेज मधून देण्यात आला आहे. तसेच माझी चर्चा वाघ सर सोबर झाले असल्याचे नमूद आहे. सदरचा मेसेज ग्रामविकास अधिकारी धोटे यांच्या नावाने टाकला असला तरी तो मेसेज विस्तार अधिकारी निलेश वाघ यांनीच मोबाईल घेऊन स्वतः टाकला असल्याचा कबुलनामा ग्रामविकास अधिकारी धोटे यांनी केला आहे. तर दुसरीकडे विस्तार अधिकारी निलेश वाघ यांनी सदर विषयाला दुजोरा दिला असून पंचायत समिती, पंचायत विभागाकडून असा कोणताही मेसेज व्हायरल झाला नसल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे सदरच्या प्रकरणात वरिष्ठांकडून चौकशी झाल्यास त्या व्हायरल चॅट चे सत्य समोर येईल. एकंदरीत विस्तार अधिकाऱ्याचा संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यावर दबाव तर नाही ना, ज्यामुळे आपल्या ग्रामपंचायतीचे नुकसान तर झाले नाही असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!