सलग १६ वर्षांपासून रक्तदान शिबिर समितीचा समाजपयोगी उपक्रम
धामणगाव रेल्वे
ज्या महामानवाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. त्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या सेवेसाठी समर्पित केले असून स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता प्रथमतः संपूर्ण समाजाच्या उद्धारासाठी प्राधान्य दिले. त्या महामानवाचे ६ डिसेंबर १९५६ ला महापरिनिर्वाण झाले आणि जणू संपूर्ण समाज पोरका झाला. मात्र आजही प्रत्येक व्यक्तीच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार रुजत आहे. त्या विचारांचे पाईक होऊनच गेल्या १६ वर्षांपासून ज्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले जीवन समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केले त्याच विचाराचा वारसा फुल ना फुलाची पाकळी म्हणून धामणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रक्तदान शिबीर आयोजन समिती चालवीत आहे.

या शिबिरात दरवर्षी शेकडो रक्तदात्यांचा सहभाग होत असून, या शिबिरातून रुग्णालयांना आवश्यक तेवढा रक्तसाठा उपलब्ध करून देण्यास मोठी मदत होते. यावेळी आयोजकांनी सांगितले की, “बाबासाहेबांच्या मानवतावादी विचारांपासून प्रेरणा घेत समाजासाठी काहीतरी देण्याचा हा प्रयत्न आहे.” नागरिकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम वर्षागणिक अधिक व्यापक होत असून, धामणगावच्या सामाजिक बांधिलकीची जिवंत परंपरा म्हणून ओळखला जात आहे. धामणगाव रेल्वे येथील नगर परिषद च्या प्रांगणात असलेल्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रक्तदान शिबिराची सुरवात झाली असून ६८ रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानवाला अभिवादन केले. यावेळी एकनिल ब्लड सेंटर यवतमाळ ची टीम डॉ. सागर रोडकर व त्यांच्यी टीम उपस्थित होती.














Add Comment