धामणगाव रेल्वे प्रशासन कार्यवाही

५० हजाराच्या अपहार प्रकरणात सरपंच, सचिव दोषी ; अभियंत्याने खोटे मूल्यांकन केल्याचे निष्पन्न!

पेठ रघुनाथपूर भ्रष्टाचार प्रकरण : तक्रारदाराला अंधारात ठेवून चौकशीचा फार्स !

धामणगाव रेल्वे

तालुक्यातील पेठ रघुनाथपूर ग्रामपंचायतीमधील शौचालय दुरुस्तीच्या ५० हजार निधी अपहार प्रकरणात सरपंच सचिव दोषी असल्याचे चौकशी अहवालात उघड झाले असले तरी प्रशासनाने भ्रष्टाचार लपवण्यासाठी तक्रारदाराला चौकशीची कोणतीही पूर्वसूचना न देता ‘तक्रारदार गैरहजर’ असल्याचा बनाव रचल्याचा खळबळजनक आरोप तक्रारदार दर्पण वडस्कर यांनी केला आहे. त्या संदर्भात माझ्याकडे जिओ-टॅगिंग पुरावे असून ते मांडण्याची कोणतीही संधी मला दिली नाही त्यामुळे माझ्याकडील पुरावे सादर करण्यासाठी मला संधी द्यावी अशी मागणी तक्रारदाराकडून करण्यात आली आहे.

नेमके प्रकरण काय?

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात १५ व्या वित्त आयोगातून शौचालय दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये मंजूर झाले होते. हे काम पूर्ण न करताच ११ ऑगस्ट २०२५ रोजी ‘अवधूत महाराज कन्स्ट्रक्शन’ या एजन्सीला पूर्ण रक्कम अदा करण्यात आली. तक्रार होताच, पुरावे नष्ट करण्यासाठी ११ जानेवारी २०२६रोजी घाईघाईने काम सुरू करण्यात आले असल्याचा आरोप होता.

चौकशी अहवालात भ्रष्टाचाराची कबुली

विस्तार अधिकारी गेडाम आणि सहाय्यक गटविकास अधिकारी योगेश वानखडे यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत:
* काम अपूर्ण असतानाही कनिष्ठ अभियंता यांनी खोटे मुल्यांकन दिले.
* नळ, तोट्या आणि वॉश बेसिन नसतानाही ५० हजार रुपये हडप करण्यात आले.
* यासाठी तत्कालीन सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना संयुक्तरीत्या जबाबदार धरण्यात आले आहे.

प्रशासकीय ‘गेम’ फसला!

चौकशीच्या वेळी तक्रारदार दर्पण वडस्कर यांना जाणीवपूर्वक कोणतीही नोटीस न देता त्यांना ‘गैरहजर’ दाखवण्यात आले. प्रशासनाने हा ‘फार्स’ करून भ्रष्टाचार सौम्य करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तक्रारदाराकडून होत आहे. यावर वडस्कर यांनी आक्रमक पवित्रा घेत गटविकास अधिकाऱ्यांकडे हरकत नोंदवली आहे. तक्रारदाराकडे ९ जानेवारी २०२६ पर्यंतच्या कामाची स्थिती दर्शवणारे जिओ-टॅगिंग व्हिडिओ आणि फोटो उपलब्ध आहेत. तक्रारीनंतरच काम सुरू झाले, हे या पुराव्यांवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे कनिष्ठ अभियंत्याने दिलेले मोजमाप हे पूर्णतः बनावट असल्याचे म्हणणे आहे.

तक्रारदार तसेच ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

“आम्हाला चौकशीला न बोलावता प्रशासनाने आमची बाजू दाबण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्याजवळ जिओ-टॅगिंगसह ठोस पुरावे आहेत. दोषींवर तात्काळ एफआयआर दाखल न झाल्यास आणि सरपंच-सचिवांवर कडक कारवाई न झाल्यास आम्ही जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करू.” असे तक्रारदार दर्पण वडस्कर, सुनिल टाले, अनिल भोळे व ग्रामस्थ, पेठ रघुनाथपूर यांनी सांगितले आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!