धामणगाव रेल्वे सामाजिक

माता रमाई यांना भारतरत्न बहाल करून अधिकृत राष्ट्रीय पातळीवर जयंती साजरी करावी – वैभव बावनकुळे यांची मागणी

धामणगावात त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी

धामणगाव रेल्वे

जय संविधान ग्रुप व विवेक विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य त्यागमूर्ती माता रमाई जयंती महोत्सव उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात भंते डॉ. अभय बोधी यांच्या हस्ते बुद्ध वंदना व धम्म प्रवचनाने झाली. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून बुद्धांच्या करुणा, समता आणि प्रज्ञेच्या संदेश दिला. त्यानंतर “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत भारतीय समाज” या विषयावर विवेक विचार मंचाचे महाराष्ट्र प्रमुख सुनील किटकस यांनी अभ्यासपूर्ण व विचारप्रवर्तक व्याख्यान दिले.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कव्वाली व भीम गीत गायक दिपाल इंगळे व संविधान मनोहर यांनी दणदणीत बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. “बुद्ध-भीम गीतांचा महासंग्राम” या विशेष सादरीकरणाने कार्यक्रमाला वेगळी उंची मिळाली. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष अर्चनाताई रोठे अडसड, प्रशांत मुन, ऍड. संचित घोडेस्वार, वैभव बावनकुळे, डॉ. अशोक कुचेरिया, अतुल भोगे, विनोद तिरले, दीपक राठी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग लाभला. भारतीय बौद्ध महासभा, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिका, डॉ. प्रा. विलास पाटील, प्रा. डॉ. नूतनताई शहाकार, कु. भाविका वागडे तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष अर्चनाताई रोठे अडसड यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
आपल्या ओजस्वी भाषणात वैभव बावनकुळे यांनी माता आई रमाई यांच्या त्यागमय आणि संघर्षमय जीवनकार्याचा गौरव करत ठाम भूमिका मांडली. “परमपूज्य विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महामानव घडविण्यामागे महामाता आई रमाई यांचे मोलाचे योगदान आहे. बाबासाहेबांच्या महान कार्यामागे त्यांचा त्याग, संयम आणि संघर्ष हीच खरी शक्ती होती. त्यामुळे त्या या राष्ट्राच्या मुख्य शिल्पकार आहेत,” असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. याच अनुषंगाने त्यांनी शासनाकडे आई रमाई यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ बहाल करून त्यांची जयंती अधिकृतरीत्या राष्ट्रीय पातळीवर साजरी करण्यात यावी अशी मागणी केली
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत मुन, रवि उर्फ दादू मेघ्राम, प्रेम मोटरे, सिद्धार्थ टाले, सदानंद कांबळे, भिमराव सहारे, स्नेहल वानखेडे, संदीप रामटेके, कोहिनूर शिरोसे, पियुष शिरोसे, सीमा मुन, दिपाली जाधव, प्रनिता टाले, माधवी सावध, अरुणा भिल, प्रियंका क्षीरसागर, उन्नती मेघ्राम आदी अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोषणांनी परिसर दुमदुमला आणि जयंती महोत्सव सामाजिक एकता, प्रेरणा आणि परिवर्तनाच्या संदेशाने संपन्न झाला.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!