धक्कादायक विशेष

भिक्षेकरूची धरपकड मोहीम प्रशासनाच्या अंगलट – ४ भिक्षेकरूचा रुग्णालयात मृत्यू

भिकारी नसताना उचललं, रुग्णालयातच ४ जणांच्या मृत्यूने शिर्डी प्रशासन वादाच्या भोवऱ्यात

जनसूर्या मीडिया

साईबाबांची शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असल्यानं येथे दर तीन-चार महिन्यात भिक्षेकरी धरपकड मोहीम राबवली जाते. यंदा ४ एप्रिल रोजी रामनवमीच्या पार्श्वभूमीवर राबवलेली मोहीम प्रशासनाच्या चांगलच अंगलट आल्याचं दिसून येत आहे.
याचं कारणही तसं आहे. शिर्डीत पकडण्यात आलेल्या पन्नास भिक्षेकरूंपैंकी चार जणांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आमचे नातेवाईक भिक्षेकरी नव्हते तर तो मोलमजूर होते असा दावा करत नातेवाईकांनी प्रशासनाच्या कारवाईवरच प्रश्न चिन्ह उपस्थित करत जिल्हा रुग्णालयाला चौघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरवलं आहे.
४ एप्रिल २०२४ सकाळी सहा वाजता शिर्डी नगरपरिषद, शिर्डी पोलीस स्टेशन आणि साई संस्थान यांनी एकत्रित नेहमीप्रमाणे भिक्षेकरी धरपकड मोहीम राबवली. या मोहिमेत पन्नास भिक्षेकरींना ताब्यात घेण्यात आलं. यातील अनेक जणं विविध आजारांनी ग्रासलेले तसेच व्यसनाधीन झाल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत होतं. शिर्डी पोलिसांनी या सर्वांची वैद्यकीय तपासणी करत त्यांना राहाता न्यायालय हजर केलं. न्यायालयाच्या आदेशानं त्यांची रवानगी अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील विसापुर येथील शासकीय भिक्षेकरी स्वीकार केंद्रात करण्यात आली.

चार भिक्षेकरूंचा मृत्यू…

विसापुर भिक्षेकरू सुधारगृहात पाठवण्यात आलेल्यांपैकी दहा भिक्षेकरुंची प्रकृती दोन दिवसानंतर खालावल्यानं त्यांची रवानगी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी करण्यात आली आणि याच ठिकाणी उपचारादरम्यान प्रथम एक आणि नंतर तीन असे चार भिक्षेकरुंचा मृत्यू झाला. यातील चार मृत भिक्षेकरूंपैकी दोघे शिर्डी परिसरातील स्थानिक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एक राहाता तालुक्यातील पिंपळस येथील रहिवासी ४६ वर्षीय सारंगधर वाघमारे यांच्या नातेवाईकाच्या म्हणण्यानुसार, तो शेती आणि मोलमजूरी करत होता. पिंपळस येथून आपल्या बहिणीला भेटण्यासाठी शिर्डीला आला होता. बहीण आणि मेहुण्याची भेट घेऊन तो परत जात असताना शिर्डी बसस्थानकावरच भिक्षेकरू धरपकड मोहीमेत सापडला. कोणतीही शहानिशा न करता नगर परिषदेच्या पथकाने त्याला भिक्षेकरू म्हणून घोषीत करत कारवाई केली.
सकाळी सकाळीच शिर्डी प्रशासनाने त्याला भिक्षेकरी मोहीमेत उचलून नेलं. भिकारी नसताना आमच्या माणसाला ताब्यात कसं घेतल. जसा नेला, तसा आणून द्या’ अशी मागणी मृत वाघमारे यांच्या नातेवाईकांनी केली आहे. खरंतर शिर्डीत भिक्षेकरू मोहीम राबवताना ज्याला भिक्षेकरू म्हणून ताब्यात घेतलं जातं तो खरंच भिक्षेकरी आहे का, याची खातरजमा प्रशासनाकडून होणं अपेक्षित असतं. फक्त कारवाई म्हणून कारवाई केली जाते. अंगावरील कपडे मळकट असेल तर त्याला भिक्षेकरू म्हणणे चुकीचं असून राज्य मानव अधिकार आयोगाकडे यांची तक्रार करणार असल्याचं मानवाधिकार संघटनेचे प्रमुख विक्रांत वाकचौरे यांनी स्पष्ट केलं.
मुंबई भीक मागण्यास प्रतिबंध कायदा १९५९ च्या कलम ५ प्रमाणे शिर्डी प्रशासन कारवाई करत आहे. मात्र ही कारवाई करत असताना धरपकड होणाऱ्या तथाकथित भिक्षेकरुंच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच गदा आणली जात आहे. कारवाईमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या भिक्षेकरुने आपली ओळख पटवून दिली. तर प्रशासनाने त्यांना तत्काळ सोडवून द्यावे अशी कायदात तरतूद असताना फक्त कारवाई दाखवण्यासाठी शिर्डी प्रशासन काम करत असल्याचा आरोप वकील राहुल तुपलोंढे यांनी केला आहे. ४ एप्रिल रोजी प्रशासनाकडून झालेल्या मोहीमेत अनेक नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप करत सांरगधर वाघमारे आणि मृत इसाक शेख यांच्या नातेवाईकांनी दोघांचे ही मृतदेह शिर्डी पोलीस स्टेशनसमोर आणून संबंधित दोषींवर कारवाईची मागणी केली. यावेळी नातेवाईंनी मृतदेहा समेवत येथे ठिय्या देत आक्रोश देखील केला आहे. आमचा माणूस जसा नेला तसा आणून द्या अशी मागणी करत दोन्ही मृतकांच्या नातेवाईकांनी परिसर दणाणून सोडला.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!