शहरातील अकोली परिसरातील खुल्या भूखंडात एका व्यक्तीचे डोके नसलेला मृतदेह आढळला होता. क्रूरतेचा कळस गाठलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती. दरम्यान या मृतकाची ओळख पटली.
त्यानंतर थोड्याच वेळात मारेकऱ्याचे नाव समोर आले. मृतक व्यक्ती व मारेकरी एकाच गावातील असून त्यांच्यात आर्थिक व्यवहार होते. याच व्यवहारातून भारतीय सैन्य दलातील ३० वर्षीय जवानाने त्या वृद्धाचा क्रूरपणे खून केला. त्यानंतर या जवानाने वृद्धाचे मुंडके धडापासून वेगळे करून ३० कि.मी. सोबत नेले आणि आसेगाव परिसरात टाकल्याचे समोर आले. मारेकरी जवानाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
दुर्योधन बाजीराव कडू (६५, रा. भूगाव, अचलपूर) असे मृताचे, तर निकेतन कडू (३०, रा. भूगाव, अचलपूर) असे आरोपीचे नाव आहे. दुर्योधन आणि निकेतन हे नातेवाईक आहेत. निकेतन भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे. मागील वर्षी निकेतनने दुर्योधन कडू यांच्याकडून काही रक्कम उधारीवर घेतली होती. याच पैशांवरून त्यांच्यात शाब्दिक वाद होते.
दरम्यान, निकेततने पोलिसांना सांगितले, की मी उधार घेतलेली रक्कम दुर्योधन यांना दिली होती. तरीही ते वारंवार व्याज व इतर रकमेसाठी मानसिक त्रास देत होते. मी तुमची सर्व रक्कम अमरावतीत देतो म्हणत निकेतनने दुर्योधन कडू यांना दुचाकीवरून अमरावतीत आणले. शहरालगतच्या अकोली भागातील खुल्या भूखंडापासून ते दोघेही दुचाकीने जात होते. त्यावेळी दुर्योधन यांनी दुचाकी थांबव, मला लघुशंकेला जायचे आहे असे त्याला म्हटले. ते लघुशंकेसाठी उतरताच निकेतनने बॅगमधून सत्तूर काढला आणि दुर्योधनचा गळा चिरला. तसेच धडापासून डोके वेगळे करून टाकले. त्यानंतर मृतदेह त्याच ठिकाणी झाडाझुडपात लपवून ठेवला आणि दुर्योधन यांचे डोके बॅगमध्ये ठेवून २५ ते ३० किलोमीटर अंतर दुचाकीवरून आसेगाव परिसरातील एका नाल्यालगत टाकला. पोलिसांनी निकेतनला ताब्यात घेतल्यानंतर त्याने डोके कुठे टाकले याची माहिती दिली. त्या आधारे पोलिसांचे निकेतनला ताब्यात घेतले आहे.
आसेगाव परिसरात मिळाले शिर
निकेतन दसऱ्यापासून ड्युटीवर गेलाच नाही निकेतन हा २०१५ मध्ये भारतीय सैन्य दलात रुजू झाला होता. तो सध्या पंजाबमधील अंबाला कँट या ठिकाणी कार्यरत होता. दरम्यान, दसऱ्याला तो गावी सुटीवर आला. त्यानंतर तो ड्युटीवर रुजू होण्यासाठी गेला नव्हता. त्यावेळेपासून तो गावातच होता. दुर्योधन कडू हे उधारीच्या पैशांवरून मानसिक त्रास देत असल्यामुळे हे कृत्य केल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे.
मृतक दुर्योधन कडू व निकेतन यांच्यात आर्थिक व्यवहार होते. त्यामधूनच हे खून प्रकरण घडल्याचे समोर येत आहे. निकेतनने डोके आसेगाव भागात टाकल्याचे सांगितले होते. तेथे शोधले असता त्या मृतदहाचे डोके सापडले आहे. – गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त
Add Comment