अमरावती

विजेचा धक्का लागून ६५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; महावितरणच्या कथित हलगर्जीपणा जबाबदार ?

संबंधित महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी…!

कुऱ्हा प्रतिनिधी

शेतात विजेचा धक्का लागून एका ६५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मुत्यू झाल्याची धक्कादायक घटना दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी कुऱ्हा पोलीस स्टेशन हद्दीतील चनुष्ठा गावात घडल्याचे उघडकीस आले आहे. अशोक शेषराव आमले असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी अशोक आमले यांच्या मृत्यूस कारणीभूत महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कथित निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

शेतातील खांबावरील तुटलेला वायर आणि संपूर्ण खांबावर चढलेला वेल

याप्रकरणी चनुष्ठा बोडी येथील शेतकरी अशोक आमले यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या संबंधित महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारे निवेदन कुऱ्हा पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. निवेदनानुसार, ३० ऑगस्ट रोजी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास अशोक आमले हे आपल्या शेतातील कामासाठी गेले असता शेतातील विद्युत तारांमुळे त्यांना विजेचा धक्का बसला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. विद्युत तारांबाबत पूर्वीपासून तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित महावितरण अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पंचनामा, तसेच इतर कायदेशीर कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!