अमरावती

जि. प. शाळेत विद्यार्थ्यांना घरून अन्न आणावे लागत असल्याचा आरोप – चौकशीची मागणी

तक्रारदार देवेंद्र भोंडे यांची चिखलदरा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाविरोधात चौकशीची मागणी

अमरावती प्रतिनिधी –

पंचायत समिती चिखलदरा अंतर्गत जि.प. शाळा बागलिंगा आणि जि.प. शाळा कोहणा येथे विद्यार्थ्यांना घरून भाजी, डाळ, चटणी आदी अन्नपदार्थ आणावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगत संबंधित शाळा व शिक्षण विभागाच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारदार प्रेम थॉमस, दलित पँथर जिल्हाध्यक्ष तथा देवेंद्र यो. भोंडे, जिल्हा सचिव, इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन, अमरावती यांनी याबाबत आयुक्त, अमरावती विभाग यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे. तक्रारीनुसार, संबंधित शाळांना शासनाकडून विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी निधी, धान्य व इतर साहित्य उपलब्ध होत असताना काही विद्यार्थी मधल्या सुट्टीत घरून अन्न घेऊन येत असल्याचे निदर्शनास आले. लहान विद्यार्थी घरातील अन्न स्वतः घेऊन शाळेत आणत असल्याने अन्नाची स्वच्छता व सुरक्षितता तपासली जाते का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

घरून आणलेल्या अन्नामुळे एखाद्या विद्यार्थ्याला अन्नविषबाधा किंवा आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची राहणार, याबाबतही तक्रारीत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच शाळेतील स्वच्छता व्यवस्था, शिक्षकांचे कथित अरेरावीचे वर्तन आणि विद्यार्थ्यांना नियमानुसार पोषण आहार मिळतो की नाही, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांच्या शाळा भेटींची माहिती मागविण्याची मागणी

गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांनी संबंधित शाळांना मागील काळात किती भेटी दिल्या, त्या भेटींचे दिनांक काय आहेत आणि तपासणी अहवालात कोणत्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत, याची माहिती मागवून तपासणी करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. याशिवाय पोषण आहाराचे स्टॉक रजिस्टर, वितरण नोंदवही, मागील एक वर्षातील निधी व साहित्याचा तपशील तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात नियमानुसार पोषण आहार दिला जातो की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाईची मागणी

चौकशीत अनियमितता किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करावी. गंभीर गैरव्यवहार अथवा कायद्याचे उल्लंघन आढळल्यास लागू कायद्यानुसार फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित बाब असल्याने तक्रारीची तातडीने दखल घेऊन स्वतंत्र चौकशी करावी आणि केलेल्या कारवाईचा अहवाल तक्रारदारास द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!