दत्तापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार ; मात्र अद्याप गुन्हा दाखल नाही
धामणगाव रेल्वे –
येथील तहसील कार्यालय अंतर्गत तरोडा गावातील जिवंत व्यक्तीला मय्यत दाखवून शेतीचा फेरफार घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. सदरील व्यक्ती जिवंत असूनही सन २०२० मध्ये त्या व्यक्तीला त्याच्याच नातेवाईकाने मय्यत दाखवून त्या शेतीचा फेरफार घेत वाटणीपत्र केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. पांडुरंग भगवान पाटील वय- ४९, रा. तरोडा. ता. धामणगाव रेल्वे हि व्यक्ती जिवंत असताना त्यांच्याच नातेवाईकाने तहसील कार्यालय धामणगाव रेल्वे येथे शेताची आपसी वाटणी करण्याकरिता २०२० मध्ये प्रकरण दाखल केले होते. त्यामध्ये पांडुरंग भगवान पाटील याना मय्यत दाखविण्यात आले होते. तत्कालीन नायब तहसीलदार यांनी कुठलीही शहनिशा न करता फक्त प्रकरण दाखल करणाऱ्याच्या मनाने ऐकून पांडुरंग पाटील यांना मय्यत दाखवीत शेताची परस्पर वाटणी करून दिली. त्या अनुषंगाने मंडळ अधिकारी यांनी हा फेरफार घेतला आहे.
तक्रारदार पांडुरंग पाटील यांची पोलिसात तक्रार, मात्र अद्याप गुन्हा दाखल नाही
तक्रारदार पांडुरंग पाटील यांचे तरोडा येथील शेत शिवारात गट क्र – ९३ क्षेत्रफळ ४.२० वडिलोपार्जित शेत असून मध्यंतरी काळात ते पुण्याला कामानिमित्त गेले असताना त्यांच्याच नातेवाईकाने त्यांना मय्यत दाखवून शेताची परस्पर वाटणी करून घेतली. पुण्यावरून परत आल्यानंतर त्यांना सदर प्रकार लक्षात आला असता त्यांनी तहसील कार्यालयातील शेत फेरफारच्या नकला काढल्या नंतर त्यांना धक्काच बसला. चक्क त्यांना मय्यत दाखवून शेताची परस्पर वाटणी करून तसा फेरफार घेण्यात आला होता. मात्र प्रकरणात मय्यत व्यक्तीच्या नावाचे मृत्युपत्र उपलब्ध नसताना सुद्धा तत्कालीन नायब तसदिलदार यांनी हा आदेश पारित केलाच कसा हे नसमजणारे होते. आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच तक्रारदार यांनी सतीश भगवान पाटील, ब्रम्हादास सखाराम पाटील, विष्णू सखाराम पाटील, बाबाराव सखाराम पाटील, अशोक सखाराम पाटील, चंद्रशेखर सखाराम पाटील, एक महिला असे ७ आरोपीविरुद्ध दत्तापूर पोलीस ठाण्यात दि. ०९ एप्रिल २०२६ रोजी लेखी तक्रार दाखल केली. मात्र अद्यापही या प्रकरणात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने तक्रारकर्त्याकडून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
तहसील मधील भोंगळ कारभारा विरुद्ध तक्रारकर्त्याची उपविभागीय अधिकाऱ्याकडे धाव
जिवंत व्यक्तीला मय्यत दाखवून परस्पर शेताची वाटणी करून देणाऱ्या तत्कालीन नायब तहसीलदार तसेच मंडळ अधिकाऱ्यांविरोधात उपविभागीय अधिकाऱ्याकडे न्याय मागणार असल्याचे मत तक्रारकर्ते पांडुरंग भगवान पाटील यांनी दिले आहे..
सदर प्रकरणात तक्रार प्राप्त असून चौकशी करिता तहसील कार्यालयातील दस्तावेज मागविण्यात आले आहे. चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात येईल – गिरीश ताथोड, ठाणेदार दत्तापूर पोलीस स्टेशन
Add Comment