१३६ तक्रारी प्राप्त ; १५ तात्काळ निकाली
धामणगाव रेल्वे
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतुन तालुकास्तरावर जनता दरबाराचे आयोजन करून तात्काळ समस्यांचे निराकरण करण्याचा सूचना असताना दि. १८ फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालय, धामणगाव रेल्वे येथे पंचायत समिती व तहसील यांच्या संयुक्तीतरित्या जनसंवाद तक्रार निवारण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून कु. दुर्गा देवरे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन अमरावती, अभय घोरपडे तहसिलदार, धा. रे, प्रफुल भोरखडे गटविकास अधिकारी, धा. रे, विनोद राऊत तालुका कृषी अधिकारी, किशोर सानप उपअधिक्षक, भुमीअभिलेख धा.रे, गायत्री चव्हाण बाल विकास प्रकल्प अधिकारी हे प्रामुख्याने उपस्थित होते.
नागरिकांनी खाली बसून प्रशासनाच्या नियोजनाबद्द्दल व्यक्त केला रोष
नियोजनाच्या अभावामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोंधळ
१८ फेब्रुवारीच्या जनता दरबाराचे पत्र हे १६ तारखेमध्ये काढले असले तरी ते ग्रामपंचायत स्तरावर तसेच महसूल विभागापर्यंत १७ ला देण्यात आले. तसेच पंचायत समितीचे पत्रात जनता दरबाराचा वेळ सकाळी १० : ३० चा असून तहसील कार्यालयाच्या पत्रामध्ये जनता दरबाराचा वेळ १२ वाजताचा होता. मात्र १२ :३० वाजेपर्यंत कुठलाही अधिकारी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित नसल्याने तसेच तक्रार स्वीकारण्यासाठी कुठलाही टेबल नसल्याचे लक्ष्यात येताच प्रहार चे तालुका अध्यक्ष सुरज गंथडे तसेच क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघान यांनी सदर बाबीचा जाब विचारत खाली बसून प्रशासनाच्या नियोजबाबत रोष व्यक्त केला. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. मात्र तहसीलदार अभय घोरपडे तसेच गटविकास अधिकारी प्रफुल भोरखडे यांनी पुढचा कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने तसेच प्रसिद्धी पत्रकाद्वारे जनता दरबार आयोजित करण्यात येईल अशी समजूत काढून कार्यक्रमाला सुरुवात केली.
सर्वप्रथम सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभय घोरपडे, तहसिलदार यांनी केले असून महिला बचत गट यांना धनादेश वितरण, राशन धारकांना नवीन राशन कार्ड वितर , संजय गांधी निराधार योजनेतील मंजूर लाभार्थींना मंजूर लाभार्थी पत्र वितरण व तसेच नगर परिषद धामणगाव रेल्वे मार्फत दिव्यांग निधी वितरण प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. त्यानंतर जनतेच्या तक्रारीचा आढावा घेण्यात आला.
जनता दरबारात उपस्थित नागरिक सह कर्मचारी
अन…. नागरिकांनी जनता दरबारात वाचला समस्यांचा पाढा
उशिरा सुरु झाला असला तरी नागरिकांनी आपल्या समस्या परखडेपणे मांडून प्रशासनाला धारेवर धरले, ज्यामध्ये महसूल विभाग अंतर्गत सातत्याने शेताला असणारा रस्ता, पांदण रस्ता तसेच जळगाव आर्वी येथील नागरिकाचे पुनर्वसन विषयाबाबत, तसेच पुरवठा विभागामध्ये नवीन राशन कार्डसाठी महिला अधिकारी २ हजार रुपये मागत असल्याचा आरोप यावेळी चिंचपूर येथील माजी उपसरपंच शिशिर शेंडे यांनी केला. तर पंचायत समिती अंतर्गत सुद्धा घरकुल मुद्दा, तालुक्यातील रोजगार सेवकांकडून पैशाची मागणी करीत असल्याबाबत च्या अनेक तक्रारी जनता दरबारात उपस्थित करण्यात आल्या. तर आरोग्यविषक अतिक्रमणाचा मुद्धा विषयात चर्चिला गेला. त्यामुळे सादर तक्रारी १५ दिवसाच्या आत निष्कासित करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी यांनी सचिवांना दिल्या.
सदरच्या कार्यक्रमामध्ये एकूण १३६ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी १५ तक्रारी तात्काळ निकाली काढण्यात आल्या व उर्वरीत तक्रारी संबंधीत विभागाला निकाली काढण्या करिता पाठविण्यात आल्या आहे. कार्यक्रमातील नागरिकांचा अधिकाऱ्याप्रती रोष पाहता तहसीलदार यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारीला प्रथम प्राधान्य देण्याचे यावेळी सांगितले. सदर कार्यक्रमाची सांगता रितुराज पटोरकर, निवासी नायब तहसिलदार यांनी केले.













Add Comment