धामणगाव रेल्वे

मुख्य रस्त्यावरील वाढते अतिक्रमण सर्वसामान्य जनतेसाठी डोकेदुखी ; नगराध्यक्षा लक्ष घालतील का ?

वाहतूक कोंडीसाठी प्रमुख कारण ठरतेय वाढते अतिक्रमण

धामणगाव रेल्वे 

अमरावती जिल्ह्यात लोकसंख्येच्या तुलनेत पहिल्या क्रमांकावर असणारे जुळे शहर म्हणून दत्तापूर धामणगावची ओखळ आहे. असे असतानाही येथील वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडलेली दिसून येत आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे मुख्य रस्त्यावर वाढलेले अतिक्रमण ज्याचा सर्वात जास्त फटका हा सामान्य जनतेला बसत आहे. तर वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न सातत्याने उपस्थित होत असून त्याला जबाबदार काहीश्या प्रमाणात शहरातील स्वतंत्र वाहतूक पोलीस यंत्रणा सुद्धा आहे. शहरातील प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीवर नियंत्रण ठेवणारा एकही वाहतूक पोलीस दिसत नसल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
काँटन मार्केट चौक भगतसिंग चौक गांधी चौक सिनेमा चौक टिळक चौक बुधवार बाजार शास्त्री चौक शिवाजी चौक बसस्थानक परिसर अशा अत्यंत गर्दीच्या व अपघातप्रवण भागांमध्ये दिवसभर वाहतुकीचा गोंधळ उडालेला असतो. दुचाकी, चारचाकी, ऑटो रिक्षा, हातगाड्या व पादचारी यांची सरमिसळ होऊन वारंवार वाद, अपघात व वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण होत आहे. मात्र या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी असलेले पोलीस कर्मचारी प्रत्यक्षात शहराच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी करून मालसुतो अभियानात व्यस्त असल्याचे काही सुजाण नागरिकांचे म्हणणे आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक पूर्णतः रामभरोसे झाली आहे. दत्तापूर धामणगाव रेल्वे शहरात आजूबाजूच्या सुमारे पन्नास गावांतील विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी व सामान्य नागरिक दररोज शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी ये-जा करतात. विशेषतः ग्रामीण भागातून येणारे आदिवासी शेतकरी आपल्या शेतातील मका, ज्वारी, तूर, भाजीपाला व इतर शेतमाल विक्रीसाठी दत्तापूर धामणगाव शहरात येतात. मात्र नाक्यांवर उभेअसलेले वाहतूक पोलीस अनावश्यक अडवणूक व दंडाच्या नावाखाली त्रास देत असल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शहरातील मुख्य चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा नाही, पार्किंगची कोणतीही ठोस व्यवस्था नाही, रस्त्यांवर अतिक्रमण वाढलेले आहे. अशा परिस्थितीत वाहतूक पोलीस जर शहरातील वर्दळीच्या ठिकाणी उपस्थित राहून नियोजनबद्ध वाहतूक नियंत्रण करत नसतील तर अपघातांचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे.

नवनिर्वाचित नगराध्यक्षा अर्चना अडसड ( रोठे ) वाढत्या अतिक्रमणावर लक्ष घालतील का ?

सातत्याने वाहतूक कोंडी, किरकोळ अपघात, व वारंवार होणाऱ्या वादविवादाला कारणीभूत असलेल्या मुख्य रस्त्यावरील वाढलेले अतिक्रमण हे सर्वसामान्य जनतेसाठी मोठी डोकेदुखी ठरत असून ज्या सर्व सामान्य जनतेने एकहाती सत्ता प्रस्थापित वर्गाला दिली असताना आज मोठ्या प्रमाणात जनतेलाच त्रास सहन करावा लागत असल्याने नवनिर्वाचित नगराध्यक्षा अर्चना अडसड ( रोठे ) या वाढत्या अतिक्रमणावर लक्ष घालतील का हा प्रश्न समस्त जनतेला पडला आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!