धामणगाव रेल्वे

घरकुल धारकांच्या तांत्रिक समस्या सोडविण्यासाठी धा. रे. पंचायत समिती कार्यालयात ई केवायसी शिबिराचे आयोजन

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम

धामणगाव रेल्वे प्रतिनिधी

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत प्रथम हप्ता तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पंचायत समिती धामणगाव रेल्वे येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर माननीय गटविकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल भोरखडे आणि सहाय्यक गटविकास अधिकारी योगेश वानखडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
या शिबिरात प्रामुख्याने लाभार्थ्यांच्या ई केवायसी प्रक्रियेची पूर्तता करण्यात आली. ज्या लाभार्थ्यांचा पहिला हप्ता आधार प्रमाणीकरण किंवा इतर तांत्रिक अडचणींमुळे रखडला होता, त्यांना येथे आधार कार्ड, बँक खाते तपशील आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या सत्यापनाद्वारे तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे अनेक लाभार्थ्यांना लवकरच हप्त्याचे वितरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिबिरात स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, डाटा एन्ट्री ऑपरेटर तसेच ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांची उपस्थिती होती. या अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना योजना संबंधित मार्गदर्शन केले आणि त्यांच्या तक्रारींचे निराकरण केले. गटविकास अधिकारी श्री. डॉ.प्रफुल्ल भोरखडे सर यांनी शिबिराचे उद्घाटन करताना सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजना ही ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देणारी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. तांत्रिक अडथळे दूर करून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवणे हे या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट होते.
या शिबिराला लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक लाभार्थी सकाळपासूनच पंचायत समिती कार्यालयात हजर झाले होते. शिबिरादरम्यान ई केवायसी पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांनी प्रशासनाचे आभार मानले. एका लाभार्थिनी म्हणाल्या, “आमचा पहिला हप्ता गेल्या काही महिन्यांपासून रखडला होता. आज ई केवायसी पूर्ण झाल्याने आता घर बांधण्याचे काम सुरू करता येईल.”
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी तीन हप्त्यांमध्ये एकूण १.२० लाख रुपये आणि मस्टर चे २६ हजार रुपए (महाराष्ट्रात राज्य सरकारच्या अतिरिक्त अनुदानासह अधिक) दिले जातात. मात्र, आधार लिंकिंग आणि ई केवायसी न पूर्ण झाल्याने अनेक लाभार्थ्यांचे हप्ते प्रलंबित राहतात. अशा समस्या सोडवण्यासाठी राज्यभरात अशी शिबिरे आयोजित केली जात आहेत.

यापुढेही अशा शिबिरांचे आयोजन करून योजनेचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवला जाईल. या उपक्रमामुळे धामणगाव रेल्वे पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावांतील अनेक गरीब कुटुंबांना लवकरच स्वतःचे पक्के घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे – डॉ. प्रफुल्ल भोरखडे, गटविकास अधिकारी धा. रे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!