धामणगाव रेल्वे

अखेर…….. तळेगावच्या नागरिकांचे आमरण उपोषण सुटले – प.स. वरुड टीम करणार ग्रा. प. चौकशी

आमदार प्रताप अडसड़ यांच्या मध्यस्थी करीत सोडवले उपोषण

धामणगाव रेल्वे

तळेगाव दशासर येथील ग्रामपंचायतीच्या घरे, सिंचन विहिरी, स्वच्छ भारत अभियान यासारख्या योजनांमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी १० जूनपासून येथील स्टेट बँकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. २९ मे रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत या योजनांमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचार आणि अनियमिततेचे भौतिक आणि संरचनात्मक लेखापरीक्षण करून दोषींवर योग्य कारवाई करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता, परंतु यामध्ये कोणतीही कारवाई न झाल्याने, तीन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू होते. आज दुपारी १.३० वाजता प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांसह आमदार प्रताप अडसड यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्या जाणून देत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
या एक तास चाललेल्या चर्चेत, ग्रामपंचायत स्तरावर घरे, सिंचन विहिरी आणि स्वच्छ भारत मिशन फेज १ मध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराचे भौतिक आणि संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याचे आणि येत्या काही दिवसांत जिल्हास्तरीय समितीमार्फत दोषींवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर, उपोषणकर्त्या ग्रामस्थांना आमदार प्रताप अडसड यांनी सरबत देऊन त्यांचे उपोषण सोडले.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढले चौकशी समितीचे आदेश

तीन दिवसापासून उपोषणावर बसलेल्या नागरिकांची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतली असून सदर तळेगाव द ग्रा. प. ची चौकशी करण्यासाठी वरुड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, सहाय्यक लेखाधिकारी या चार सदस्यीय समितीची निवड करण्यात आल्याचे आदेश आज दि. १३ जून २०२५ रोजी काढण्यात आले आहे.
यावेळी आमदार प्रतापदादा अडसड, प्रभारी गटविकास अधिकारी वानखडे, विस्तार अधिकारी नीलेश वाघ, जरी साहेब, काळे साहेब विस्तार अधिकारी पंचायत विभाग, अध्यक्ष, ठाणेदार रामेश्वर धोंगडे आणि ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!