धामणगाव रेल्वे सामाजिक

धनराज उर्फ धनसिंग वहिले यांना अखेरचा निरोप ; माणुसकीच्या हातांनी दिला सन्मान!

धामणगाव रेल्वे (प्रतिनिधी) –

गावाकडून शहराकडे आलेल्या अनवाणी पावलांची ही लढाई घरासाठी नव्हे, तर केवळ वीतभर पोटासाठी होती. रस्त्याच्या कडेला, चौकाचौकांत शांत निर्विकार चेहऱ्याने अनेकांच्या आठवणीत स्थान मिळवलेले धनराज विठोबाजी वहिले उर्फ धनसिंग ठाकूर (वय अंदाजे ७० वर्षे, मूळगाव – गुंजी) यांचे शनिवारी, २४ मे २०२५ रोजी रात्री १०.३० वाजता ग्रामीण रुग्णालय, धामणगाव रेल्वे येथे निधन झाले.
“हे विश्वचि माझे घर” या भावनेने रस्त्यावर अर्धनग्न अवस्थेत जगणाऱ्या या वृद्धाची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अत्यंत खालावली होती. एक डोळा निकामी झाला होता. रस्त्याच्या कडेला झोपल्यामुळे अंगावर झालेल्या जखमा, त्यावर घोंघावणाऱ्या माशा आणि शरीरात मुरलेला ताप अशा स्थितीत असलेल्या धनसिंग यांना शनिवारी सकाळी ११.३० वाजता कृषीरत्न सच्चिदानंद काळे यांच्या पुढाकाराने व दोन-तीन होतकरू तरुणांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. मुबश्शीर अहमर यांनी त्यांच्यावर उपचार केले. मात्र उपचारादरम्यान रात्री १०.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

धनसिंग वहिले यांच्या अखेरच्या क्षणी कोणी आप्त नसले, तरी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी धामणगाव शहरातील माणुसकी पुढे सरसावली. सामाजिक कार्यकर्ते सच्चिदानंद काळे, मातोश्री फाऊंडेशन मंगरूळ दस्तगीरचे संचालक उमेश भुजाडणे, स्व. सुरेशराव शिरभाते स्मृती प्रतिष्ठानचे विनय शिरभाते आणि इतर सेवाभावी नागरिकांनी पुढाकार घेत, रविवार २५ मे रोजी दुपारी १२ वाजता मोक्षधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले. बौद्ध धम्माच्या परंपरेनुसार विधीवत त्रिशरण-पंचशील घेण्यात आले व हिंदू पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
विदर्भ साहित्य संघ, ओसवाल ट्रस्ट (महावीर भवन) यांच्यासह शहरातील अनेक मान्यवरांनी या मानवतावादी कृतीचे कौतुक करत, धनसिंग वहिले यांच्या आठवणींना उजाळा दिला. “कधी सकाळी टपरीसमोर चहा घेताना दिसायचा, तर कधी कोणाला दहाची नोट मागताना… कधी चौकात फिरताना तर कधी रस्त्याच्या कडेला शांत बसलेला हा माणूस न बोलता एक जगणं सांगून जायचा,” अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

रस्त्यावर भीक मागून जगलेले आयुष्य, अखेरीस एका ‘माणूस’ म्हणून सन्मानाने निरोप देणाऱ्या या प्रसंगातून समाजातील माणुसकी आणि बांधिलकी यांचे दर्शन घडले. या अंत्यविधीसाठी दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी बोधीसत्व काळे, आशिष काळबांडे, वसंतराव देशमुख, कवाडे सर, प्रवीण इंगळे, पोलीस कर्मचारी अतुल पाटील व पुंडलीक चव्हाण तसेच अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.

 

“धनसिंगजी आपल्यापैकी कुणाच्या रक्ताच्या नात्यातले नसले, तरी मानवसमाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला, हेच खऱ्या माणुसकीचे दर्शन आहे. शेवटच्या क्षणी कुणीही त्यांच्यासोबत नव्हते म्हणून त्यांचा अंत्यविधी सन्मानपूर्वक होणं ही आपली सामाजिक जबाबदारी होती. अशा प्रसंगी माणुसकी हीच खरी ओळख ठरते.”

सच्चिदानंद काळे, सामाजिक कार्यकर्ते 

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!