धक्कादायक

चांदीच्या बांगड्यासाठी स्मशानभूमीतच दोन भावांमध्ये राडा ; आईचा मृतदेह चितेवरही ठेवू दिला नाही ; मुलगा स्वतः झोपला

मानवतेला काळिमा फासणारी घटना 

जनसूर्या मीडिया

राजस्थानातील जयपूरजवळील शाहपूरा परिसरात मानवतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका वृद्ध मातेच्या मृत्यूनंतर तिच्या चांदीच्या बांगड्यांसाठी दोन भावांमध्ये इतकी जोरदार झटापट झाली की त्यांनी स्वतःच्या आईच्या अर्थीलाही स्मशानभूमीत ठेवू दिलं नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

चांदीच्या बांगड्यांवरून भिडले…

जयपूरच्या शाहपूरा तालुक्यातील लीला का बास गावात ही घटना घडली. माहितीप्रमाणे, गावातील एका वृद्ध महिलेचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी संपूर्ण कुटुंब, नातेवाईक आणि गावकरी उपस्थित होते. मात्र, अंतिम क्षणी तिचे दोन मुलगे तिच्या चांदीच्या बांगड्यांवरून भिडले.

बांगड्यांसाठी चितेवर झोपला मुलगा

भांडण इतकं वाढलं की एक मुलगा थेट मृत आईच्या चितेवर जाऊन झोपला, केवळ बांगड्या मिळवण्यासाठी. मृतदेह अर्थीसह जमिनीवर पडून राहिला आणि हे दोन मुलगे एकमेकांना शिवीगाळ करत, बांगड्यांची ओढाताण करत राहिले. या प्रकाराने उपस्थित सर्व नातेवाईक आणि गावकरी अवाक झाले.

सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक

या घटनेचा व्हिडिओ स्थानिकांनी चितेच्या ठिकाणी काढला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर प्रचंड संताप व्यक्त होत असून अनेकांनी या दोघांवर कठोर पोलिस कारवाई करण्याची मागणी केली आहे. व्हिडिओमध्ये दोघेही बेशरमपणे शिवीगाड करत असल्याचं स्पष्ट दिसतं.

कडक कारवाईची मागणी

स्थानिक नागरिकांनी सांगितलं की, हे दोन्ही भाऊ आईच्या मृत्यूचा आदर न ठेवता तिच्या मालमत्तेवर झडप घालण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकारामुळे गावाचे नाव बदनाम झाले असून या दोघांवर सामाजिक आणि कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, असं गावकऱ्यांनी जोरदारपणे सांगितलं.

मानवी मूल्यांचा ऱ्हास?

ही घटना केवळ एका कुटुंबाच्या मतभेदाची नसून संपूर्ण समाजासाठी एक आरसा आहे. ज्या मातेनं जन्म दिला, वाढवलं, तिच्याच मृतदेहाजवळ असा वागणूक देणं हे कलियुगातील माणसाच्या नैतिक अधःपतनाचं लक्षण मानलं जात आहे. सध्या या प्रकरणाबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. सोशल मीडियावरील दबाव आणि लोकांच्या भावना लक्षात घेता संबंधित भावांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!