दुसरी मुलगी झाली म्हणून सततचे टोमणे ; अपमानाने उचलले टोकाचे पाऊल
अमरावती प्रतिनिधी
पुण्यातील हगवणे प्रकरण ताजे असतानाच अमरावतीतून एक संतापजनक घटना समोर येत आहे. पतीच्या मानसिक छळाला कंटाळून एका विवाहित महिलेनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना समोर आल्यानंतर विवाहित महिलेच्या कुटुंबाने सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पती आणि सासूला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
शुभांगी निलेश तायवाडे (वय वर्ष ३०) असे मृत महिलेचं नाव आहे. त्या आरोग्य विभागात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या. तर त्यांचे पती निलेश तायवाडे हे सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सीनियर मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. शुभांगी आपल्या सासरच्या मंडळींसह जय भोले कॉलनी परिसरात राहत होती.
शुभांगी आणि निलेश यांचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला होता. त्यांच्या दोन मुली असून, एक तीन वर्षांची तर दुसरी केवळ एक वर्षाची आहे. शुभांगीच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, लग्नाच्या काही महिन्यांनंतरच निलेशने शुभांगीवर मानसिक आणि भावनिक छळ सुरू केला होता. सासरच्या मंडळींकडूनही हा छळ सुरू होता.
याच छळाला कंटाळून शुभांगीने आत्महत्या केली. पण तिने आत्महत्या नसून, तिला फासावर लटकवून मारण्यात आले, असा आरोप शुभांगीच्या आई वडिलांनी केला आहे. मृतदेह अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला असून, शुभांगीचा लहान भाऊ येईपर्यंत शवविच्छेदन न करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास गाडगे नगर पोलीस ठाण्याकडून सुरू असून, पती निलेश तायवाडे आणि सासूला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
Add Comment