जिल्हा परिषदेचा छुपा कार्यक्रम ; कुणालाच माहिती नाही
धामणगाव रेल्वे
अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून वरिष्ठ अधिकाऱ्यांना तालुकास्तरावर जनता दरबार घेऊन नागरिकांच्या प्रलंबित असलेल्या समस्याचे तात्काळ निवारण करण्याच्या सूचना असताना प्रत्त्येक विभागामार्फत जनता दरबाराचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगानेच पंचायत समिती धामणगाव रेल्वे येथे जिल्हा परिषद मुख्याधिकारी संजिता महापात्रा यांच्या अध्यक्षतेखाली दि. ४ फेब्रुवारीला तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर सायंकाळी एका व्हाट्सअँप ग्रुप वर सहायक गटविकास अधिकारी यांनी तालुक्यातील पहिली जन तक्रार निवारण सभा पार पडली अशी माहिती दिली. मात्र सदरच्या कार्यक्रमाची पूर्वसूचना ही जनतेला तर सोडाच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सुद्धा देण्यात न आल्याने ग्रा. प. पदाधिकारी तसेच नागरिकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.
एकीकडे जनतेसाठी घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती जनतेलाच होऊ द्यायची नाही तर कार्यक्रमाचा धिंडोरा कशासाठी असा रास्त सवाल सुजाण नागरिकांकडून विचारला जात आहे. अनेकांच्या मते कागदोपत्री दाखविण्यासाठी असे छुपे कार्यक्रम घेत असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे प. समिती मधील सदरचा जन तक्रार निवारण दिन नेमका जनतेसाठी कि, अधिकाऱ्यांसाठी हा प्रश्न सध्या गुलदस्त्यात आहे.
या संदर्भात पंचायत समिती मधील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता कार्यक्रमा बाबत सचिवांना माहिती दिली होती. जुन्या तक्रारीचा आढावा मुख्यधिकारी मॅडम यांनी घेतला तसेच उपस्थित दोन तीन नागरिकांच्या तक्रारी तात्काळ निकाली काढण्याबाबत सूचना दिल्या. तक्रार निवारण चा कार्यक्रम आणखी पुढील महिन्यात असून तेव्हा प्रसिद्धीपत्रक काढू असे सहाय्यक गटविकास अधिकारी योगेश वानखडे यांनी सांगितले.
पंचायत समिती मध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमाबद्दल ग्रा. प. ला कुठलेही पत्र नाही किंवा माहिती नाही – विश्वेश्वर दिघाडे, सरपंच जुना धामणगाव
जनतेच्या प्रलंबित तक्रारींचे निराकरण व्हावे या उद्देशाने अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र सदरच्या कार्यक्रमाची गटविकास अधिकारी यांनी आम्हाला कुठलीही माहिती दिली नसून फक्त कागदी घोडे नाचवण्यासाठी हा कार्यक्रम घेतला आहे – शुभम तरोणे, उपसरपंच कासारखेड
पंचायत समिती बाबत माझ्या स्वतःच्या काही तक्रारी प्रलंबित होत्या, मात्र सदरच्या कार्यक्रमाबाबत ग्रा.प. ला माहितीच न दिल्यामुळे सोमवारी पालकमंत्री यांच्याकडे तक्रार दाखल करणार – छोटू सिसोदे, सरपंच नायगाव













Add Comment