अमरावती

चार वर्षांपासून जलशुद्धीकरण यंत्र बंद ; खोडगावकर शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित

आर ओ सेंटर सुरू करा ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीकडे अर्ज; कार्यवाहीच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ

अमरावती – अविनाश गोंडाणे

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खोडगाव येथील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेले जलशुद्धीकरण यंत्र आर ओ सेंटर मागील चार वर्षांपासून बंद असल्याची बाब समोर आली आहे. शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेली ही सुविधा दीर्घकाळापासून बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात ग्रामस्थ आशिष टेकाडे यांनी ८ जून २०२६ रोजी ग्रामपंचायत खोडगाव येथे लेखी अर्ज सादर करून बंद असलेले जलशुद्धीकरण यंत्र तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. सदर यंत्र बंद असल्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा उल्लेख करत ग्रामपंचायतीने यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी अर्जातून करण्यात आली आहे.

अर्जामध्ये नमूद करून गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हे यंत्र बसविण्यात आले होते. मात्र, मागील काही वर्षांपासून ते बंद असल्याने या सुविधेचा नागरिकांना लाभ मिळत नाही. यामुळे नागरिकांना पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे. दरम्यान, अर्जदाराने जलशुद्धीकरण यंत्र १५ दिवसांच्या आत सुरू न झाल्यास संबंधित वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार दाखल करून पुढील पाठपुरावा करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. मात्र, सद्यस्थितीत अजुन पर्यंत यंत्र सुरू करण्याबाबत कोणती ही कार्यवाही करण्यात आली नाही
सार्वजनिक हिताच्या या प्रश्नाकडे ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन बंद असलेले जलशुद्धीकरण यंत्र तातडीने कार्यान्वित करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!